‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया थंडावली
पिंपरी : परताव्या आभावी आरटीई प्रवेश रखडविणार्या खासगी शाळांनी औरंगाबाद येथील खंडपीठात धाव घेतली आहे. जोपर्यंत खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत शाळांनी प्रवेशप्रक्रिया बंद ठेवली आहे. यासाठी शासनाने आरटीई प्रवेशासाठी बुधवारी (दि.4) एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, यामध्ये मार्च महिनाअखेरीस सलग सुट्ट्यांमुळे कोर्टानेही तारीख पे तारीख दिल्यामुळे मुदतवाढ देऊनही आरटीई प्रवेश थंडावल्याचे चित्र आहे. कोर्टाने देखील निर्णय पुढे ढकलल्यामुळे आरटीई प्रवेशास दिरंगाई होत आहे.
आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत ही 24 मार्चपर्यंत देण्यात आली होती. शाळेची परताव्यासाठी कोर्टात केस सुरु आहे. त्यामुळे कोर्टाचा निर्णय येईपर्यंत प्रवेश दिले जाणार नाही असे शाळा प्रशासनाने स्पषट सांगितल्यामुळे पालकही निराश झाले होते. कोर्टाचा निर्णय 28 मार्च मिळणार होता. यापूर्वीच पहिल्या फेरीची मुदत संपणार होती. शाळांच्या अडवणुकीमुळे पहिल्या फेरीत कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर कोर्टात धावणार्या शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (अॅलॉटमेंट लेटर) मिळाले त्यांचे प्रवेश शाळांनी कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबविले. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पुन्हा 4 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली. यामध्ये मार्चअखेरीस सलग सुट्ट्या आल्या त्यामुळे कोर्टाने देखील शाळांना 4 एप्रिल हीच तारीख दिली. दिलेल्या मुदतीत फक्त चारच दिवस पालकांना प्रवेश घेण्यास मिळाले. बाकीचे चार दिवस वाया गेलेत. मुदतवाढ देऊनही पालकांची एकप्रकारे थट्टा केल्याचे दिसते. आरटीईचे प्रवेश हे ऑनलाईन होत आहेत ते जर वेळेत झाले नाहीत तर पहिल्या फेरीतील बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.