‘आमच्या हातात सत्ता द्या, दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू’ – राहुल गांधी
बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसने कंबर कसून प्रचार केला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या एकमेकांवर करत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कलगी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली. ‘आमच्या हातात सत्ता द्या, दहा दिवसांत देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून दाखवतो,’ अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
‘मी मोदींना शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याची विनंती केली. पण त्यांनी ऐकलं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कर्जमाफी विषयी बोलताच त्यांनी अवघ्या १० दिवसांत शेतकऱ्यांचं ८ हजार कोटींचं कर्जमाफ केलं. तेव्हा मोदींनी कर्नाटकला कवडीचीही मदत केली नव्हती,’ असं राहुल यांनी सांगितलं. ‘गेल्या चार वर्षात मोदींनी शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्जही माफ केलं नाही. आता एक वर्ष राहिलंय, त्यामुळे कर्जमाफी देण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही,’ असा टोलाही त्यांनी हाणला. या संदर्भात कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरही माहिती दिली आहे.