आपले सरकार बोगस सरकार – विलास लांडे
- कच-यात कामात झालाय घोळ
पिंपरी : घरोघरचा कचरा गोळा करून मोशी कचरा डेपोमध्ये नेण्याच्या कामात घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य प्रमुख मनोज लोणकर यांना कचरा निविदा प्रकरणात शहानिशा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशीही माहिती लांडे यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारींसाठी सारथीच्या धर्तीवर आपले सरकार पोर्टल काढले, त्यामुळे आपण डिजीटल झालो, हे पोर्टल केवळ प्रसिद्धीसाठी असून आपले सरकार बोगस सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खराळवाडीतील राष्ट्रवादी कार्यालयात मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, प्रवक्ते फजल शेख, प्रशांत शितोळे, ज्येष्ट नेते हनुमंत गावडे, प्रभाकर वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, शाम लांडे आदी उपस्थित होते.
लांडे म्हणाले की, महापालिकेने शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून मोशी कचरा डेपोमध्ये नेण्याचे काम मे. एजी एनव्हायरो व मे. बी.व्ही.जी. इ. लि. यांना दिले आहे. शहर स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसार खर्च जरूर करावा, मात्र नाशिक शहरात हेच काम साधारण 1500 रूपये प्रति टन, प्रति दिन यादराने पाच वर्षासाठी चालू आहे. आपल्या शहरात 1780 रूपये दर आहे. प्रतिवर्षी 7 कोटी रूपयांची लूट होणार आहे. यात आयुक्तांचाही सहभाग नाकारता येत नाही, असाही आरोप यावेळी लांडे यांनी केला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनांतर्गत येत्या दि.10 रोजी भोसरीगाव जत्रा मैदान तर दि.11 रोजी, काळेवाडीतील एम.एम. शाळेसमोर सायंकाळी 6 वाजता. सभा होणार आहे. राज्यशासन सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कामगार कायद्यातील चुकीचे बदल, शेतकर्यांची फसलेली कर्जमाफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण व शास्तीकर माफीचा प्रश्न, रेड झोन याबाबत जाब विचारण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, अनधिकृत बांधकामे नियमित झाली नाहीत. भोसरी व चिंचवड मतदार संघात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. केवळ अधिकार्यांच्या बदल्यांचे नाटक करण्यापलीकडे प्रशासन काहीच करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.