आता तरी सकारात्मक चर्चा होईल अशी आशा आहे, शरद पवारांचा मोदींना सणसणीत टोला
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर त्यांच्या पदरी यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. कृषी कायद्यावर स्थगिती आल्यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीटकरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या कायद्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे, या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, असं शरद पवार म्हणाले.
तसंच, ‘गेल्या दीड महिन्यांपासून थंडी, वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकर्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मला आशा आहे की केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात आता ठोस संवाद साधला जाईल, जेणेकरून लोकांचे हितसंबंध लक्षात ठेवले जातील’ असा टोलाही पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.