अल्पसंख्यांक समाज घटकांमध्ये असुरशिक्षतेचे वातावरण – डॉ. रत्नाकर महाजन
- उपोषणात व्यक्त केली खंत
पिंपरी – युपीए सरकारच्या कार्यकाळात भारत देश गहु, तांदूळ, कापसाचा जगातील दोन नंबरचा निर्यातदार देश होता. मागील चार वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे शेती विकास उणे दोन टक्क्यांवर आला आहे. विद्यार्थीं, कामगार, शेतमजूर, महिला, दलित अल्पसंख्यांक अशा समाजातील सर्वच घटकांमध्ये असुरशिक्षतेचे वातावरण आहे, अशी खंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी पिंपरीत दिला.
देशात सामाजिक विषमतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते नष्ट व्हावे म्हणून उपोषण हा आत्मक्लेशाचा मार्ग काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्विकारला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड काँग्रेसतर्फे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपोषण करण्यात आले. यावेळी प्रवक्ते महाजन बोलत होते. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश कार्यकारीणी सदस्य संग्राम तावडे, महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, जेष्ठ नेते सुदाम ढोरे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जयस्वाल, माजी नगसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शाम आगरवाल, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, सर्ज्जी वर्की, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, शहर सरचिटणीस ॲड. क्षितीज गायकवाड, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे,
डॉ. महाजन म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसांचे जीवन सुकर व्हावे, रोजच्या कामात त्याचा वापर व्हावा या उद्देशाने स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी दुरदर्शन, दुरसंचार, संगणक आणि दळणवळण क्षेत्रांची पायाभूत उभारणी केली. त्याच गोष्टीचा पुरेपुर गैरवापर करुन दिशाभूल करणारी खोटी प्रलोभने दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. दिल्लीतील ‘ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सची (AIIMS)’स्थापना तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केली. तेथेच भाजपाचे केंद्रीय मंत्री औषधोपचार घेत आहेत. तेच भाजपावाले आता कॉंग्रेसने पासष्ट वर्षात काय काम केले. असे नागरीकांची दिशाभूल करणारे प्रश्न उपस्थित करतात. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.