अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजपा प्रवेशाची चर्चा

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरील व्हीआयपी कक्षात अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर ते दोघे एकाच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यामुळे सत्तार हे भाजपात दाखल होतील, अशी चर्चा रंगली आहे.
अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधून लढण्यास इच्छुक होते. पण पक्षाने त्यांना तिकीट न देता सुभाष झांबड यांना दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी त्यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.
आता पुन्हा सत्तार-दानवे भेटीमुळे या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे हेही उपस्थित होते.