#MeToo: लैंगिक छळाच्या आरोपांवर एम. जे. अकबर उत्तर देण्यास समर्थ- स्मृती इराणी
एम. जे. अकबर हे लैंगिक छळाच्या आरोपांवर उत्तर देण्यास सक्षम असून त्यांनीच यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे सांगत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या वादावर भाष्य करणे टाळले. सोशल मीडियावर ‘मी टू’ ही मोहीम सुरु झाल्यानंतर काही महिला पत्रकारांनी अकबर यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी मोदी सरकारने अद्याप मौन बाळगल्याने विरोधी पक्षांनी टीकेची राळ उडवली आहे.
इराणी म्हणाल्या, संबंधित व्यक्ती यावर उत्तर देण्यास स्वत: सक्षम आहे. मी तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे मी काही करु शकत नाही. त्यांनी स्वत: याबाबत निवेदन द्यायला हवे, असे म्हणत त्यांनी मला माध्यमांचेही कौतुक वाटते की त्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या प्रकरणातही लक्ष घातले आहे. ज्या महिला या मुद्यावर बोलत आहेत. त्यांना याबाबत लाज वाटली नाही पाहिजे. तसेच त्यांची थट्टा ही करु नये, असे आवाहन त्यांनी केली.
भाजपाच्या महिला मंत्र्यांनी MeToo अभियानाअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांचे कौतुक केले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, मी अकबर प्रकरणावर बोलण्यास योग्य व्यक्ती नाही. पण मी त्या महिलांच्या साहसाचे समर्थन करते, ज्यांनी लैंगिक शोषणाविरोधात खुलेपणाने भाष्य केले. ज्या महिला या परिस्थितीतून गेल्या आहेत, त्यांचा अनुभव खूपच वाईट असेल. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही भाष्य केले आहे.