MeToo : भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली-तनुश्री
भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांनी माझाच नाही अनेक जणींचा छळ केला आहे असाही आरोप तनुश्रीने केला आहे. तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी आम्हाला पोलिसांच्या अहवालाची कोणतीही प्रत दिली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी आम्ही जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात सादर केला त्यानंतर तनुश्री दत्ता आणि तिच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोर्टात बी किंवा सी अहवाल सादर केला आहे. हा अंतिम अहवाल नाही, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आम्ही या अहवालाला विरोध करू. पोलिसांचा अहवाल कोर्टाने मान्य केला तर आम्ही या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी केली जावी अशीही मागणी कोर्टात करू असेही सातपुते यांनी म्हटले आहे.
तनुश्री प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. पोलीस जाणीवपूर्वक नाना पाटेकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही सातपुते यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणातले असे अनेक साक्षीदार आहेत ज्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवूनच घेतलेले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचमुळे आम्ही वेळ पडल्यास या प्रकरणी जनहित याचिका दाखल करू आणि या प्रकरणाच्या चौकशीची पुन्हा एकदा मागणी करू असेही सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
हॉर्न ओके प्लीज या सिनेमातील एका आयटम साँगच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. २००८ मध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू असताना हा सगळा प्रकार घडल्याचे तनुश्री दत्ताने गेल्या वर्षी सांगितले. सुमारे दहा वर्षांनी तिने या प्रकरणाला #MeToo प्रकरणात वाचा फोडली. २००८ मध्ये हा वाद निर्माण झाल्यानंतर तनुश्री दत्ताने हा सिनेमा सोडला. तसंच ती परदेशात वास्तव्यास निघून गेली. गेल्या वर्षी तिने भारतात परतल्यावर अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.