Loksabha 2019 : उद्या फैसला, शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत उत्कंठा शिगेला
- कोण ठरणार मावळचा शिलेदार
- शिरूरचा गड कोण राखणार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघासह देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या गुरूवारी (दि. 23) जाहीर होणार आहे. निवडणुकीत राज्यभरात लक्षकेंद्रीत ठरलेल्या मावळ आणि शिरूर मतदार संघाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा विजय होणार की शिवसेना महायुतीचा विजय होणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असले तरी निकाल जाणून घेण्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरसीची निवडणूक झाली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूध्द काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पार्थ पवार असा संघर्ष झाला आहे. 29 एप्रिल रोजी मतदारांचा कौल मतपेटीत नोंद झाला आहे. उद्या मोजणी होणार आहे. त्यामुळे मावळात बारणे की पवार याबाबत सर्वांना विचार करायला लावणारे वातावरण तयार झाले आहे. दीड लाखांच्या फरकाने बारणे निवडून येणार असल्याची वल्गना शिवसेनेचे समर्थक करू लागले आहेत. तर, एक लाखाच्या आसपास मताधिक्य मिळवून पार्थ पवार विजयी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी बोलत आहेत. खरे चित्र उद्या मतोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरूध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे असा संघर्ष झाला आहे. दोघांमध्ये अटीतटीचा सामना झालेला असला तरी तरुण वर्गाकडून कोल्हे यांचाच विजय निश्चित मानला जात आहे. तर, धुरंदर राजकीय निष्कर्ष काढणा-या व्यक्तींकडून कमीअधिक फरकाने आढळराव पाटीलच निवडून येतील, असा अंदाज बांधला जात आहे. अशी द्विधा मनस्थिती असली तरी दोन्ही मतदार संघाचा निकाल जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याबाबत उद्या फैसला होणार आहे.