Ind v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय
राजकोट – वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असून सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 196 धावात गुंडाळला आणि एक डाव 272 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 181 धावात संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात केलेल्या 649 धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडिजला निम्मी धावसंख्याही उभारता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फॉलऑनची नामुष्की आली होती. तर दुसऱ्या डावातही विंडीजच्या खेलाडूंना जास्त चमक दाखवता आली नाही.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा वेस्ट इंडिजने कालच्या 6 बाद 94 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मैदानात असलेल्या किमो पॉल आणि रोस्टन चेज यांनी थोडी आक्रमक सुरुवात केली. पण उमेश यादवने पॉलला 47 धावांवर बाद करत वेस्ट इंडिजला सातवा धक्का दिला. त्यानंतर चेजने अर्धशतक पूर्ण केले. पण आश्विनने त्याला माघारी पाठवले. त्याच षटकात अश्विनने वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का दिला. वेस्ट इंडिजची अखेरची विकेट देखील अश्विनने घेत त्यांचा डाव 181 धावांवर संपुष्ठात आणला. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 468 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मोहम्मद शमीने 2 तर उमेश यादव, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. यावेळी रोस्टन चेस ( 53) आणि मिमो पॉल ( 47) वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही.
त्यापूर्वी काल भारताच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ आपल्या पहिल्या डावात पुरता कोलमडलेला दिसून आला. विंडिजचा निम्मा संघ शंभरीच्या आतच माघारी परतला होता. तत्पूर्वी, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारताने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषित केला. सामन्यात पदार्पणवीर पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी केलेल्या शतकी खेळी आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजसामोर 650 धावांचे लक्ष्य ठेवले होते.