China blocks India’s bid: हे तर मोदी सरकारच्या परदेश धोरणाचे अपयशच : काँग्रेस
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातल्यानंतर आता काँग्रेसने यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या परदेश धोरणातील अपयश पुन्हा एकदा समोर आले, असे काँग्रेसने म्हटले आहे.
पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतल्यानंतर फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांनी भारताची बाजू घेत २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. समितीच्या सदस्यांना या प्रस्तावास आक्षेप घेण्याबाबत १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. अपेक्षेनुसार चीनने या प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला आणि भारताचे प्रयत्न अपयशी ठरले.
काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. “आज पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील लढ्यात पाकिस्तान- चीनने हादरा दिला. 56 इंचाच्या छातीचे मिठी मारण्याचे धोरण आणि अहमदाबादमधील साबरमतीच्या किनाऱ्यावर झोपाळ्यावर बसून झोका घेतल्यानंतरही चीन- पाकिस्तानची जोडी भारताकडे “लाल डोळे” वटारुन पाहत आहे. यातून मोदी सरकारचे अपयशी परदेश धोरण पुन्हा एकदा दिसते”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आज फिर आतंकवाद के ख़िलाफ़ लड़ाई को चीन-पाक गठजोड़ ने आघात पहुँचाया है।
56 इंच की ‘Hugplomacy’ और झूला-झुलाने के खेल के बाद भी चीन-पाकिस्तान का जोड़ भारत को ‘लाल-आँख’ दिखा रहा है
एक बार फिर एक विफल मोदी सरकार की विफल विदेश नीति उजागर हुई।https://t.co/ZMrgCEqJxB
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 13, 2019
दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील या घडामोडींवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवता न आल्याने आम्ही निराश झालो आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.