१६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक
आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं. अंतिम फेरीतही सौरभ आणि अभिषेक यांनी मातब्बर खेळाडूंची झुंज मोडून काढत पदकांच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं.
भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत देशाच्या खात्यात ५ पदकं टाकली आहेत. पहिल्या दिवशी अपुर्वी चंदेला-रवी कुमार जोडीने १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. यानंतर ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली होती.