हमीभाव वाढ म्हणजे फसवणूकच
- अशोक चव्हाण यांची सरकारवर टीका
एका बाजूला शेतीसाठी लागणारी औजारे, अन्य साहित्य, खते, महाग करून दुसऱ्या बाजूला कृषी मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. कृषी मूल्य आयोगाच्या मागील वर्षांच्या (२०१७-१८) शिफारसींवर आधारित हमीभाव वाढ देण्यात आली आहे, त्यामुळे हीसुद्धा दिशाभूलच आहे, अशी टीका त्यांनी केली.
कृषी मूल्य आयोगाच्या २०१७-१८ च्या शिफारसीनुसार धानाचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १४८४ रुपये आहे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरला तर धानाला प्रतिक्विंटल २२२६ रुपये हमीभाव दिला पाहिजे. मात्र सरकारने धानाचा हमीभाव १७५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. हा उत्पादन खर्च पन्नास टक्के नफ्यापेक्षा ४७६ रुपयांनी कमी आहे. ज्वारीचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल २०८९ रुपये आहे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरला तर ज्वारीला प्रतिक्विंटल ३१३३ रुपये दर मिळायला हवा, पण सरकारने दीडपट म्हणून जाहीर केलेला प्रतिक्विंटल २४३० रुपये भाव हा ७०३ रुपयांनी कमी आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च २९२१ रुपये आहे. पन्नास टक्के अधिक नफा मिळून शेतकऱ्याला ४३८१ रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, परंतु मोदी सरकारने जाहीर केलेला हमीभाव ३३९९ रुपये असून तो प्रतिक्विंटल ९८२ रुपयांनी कमी आहे.