‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका त्वरीत बंद करा
- आंबेगाव तालुक्यातून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मेलद्वारे तक्रार
पिंपरी – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मेलद्वारे केली आहे.
“स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरू ठेवणे हा आचारसंहितेचा भंग आहे. भावनिक भूमिकेचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. मालिकेला विरोध नसून अमोल कोल्हे निवडणूक लढविणार असल्याने त्याचे प्रक्षेपण थांबवावे; तसेच अमोल कोल्हे यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी,’ असे तक्रारीत नमूद केले आहे.
याबाबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील म्हणाले, “अशी तक्रार आली असून ती जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाकडे पाठविली आहे.”