सौदीत 12 प्रकारच्या नोकऱ्यांवरील निर्बंधांचा 30 लाख भारतीयांवर परिणाम
रियाध (सौदी अरब) – आखाती देशात आता नोकऱ्यांच्या संधी कमी कमी होत असल्या, तरी मोठ्या संख्येने भारतीय तेथे जात असतात. दुबई आणि सौदी अरब ही त्यांची सर्वात मोठी केंद्रे आहेत. व्हिजन 2030 वर काम करत असलेल्या सौदी अरबमध्ये तर भारतीयांसाठी नोकऱ्यांच्या संधी आणखीनच कमी होत आहेत देशातील लोकांनाच अधिकाधिक नोकऱ्या देण्याच्या त्यांच्या धोरणाने 12 प्रकारच्या नोकऱ्या परदेशींना न देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम तेथे राहणाऱ्या सुमारे 30 लाख भारतीयांवर पडणार आहे. आणि तेथे जाऊ इच्छिणाऱ्यांवर तर पडणारच आहे.
सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान सौदीच्या अर्थव्यवस्थेला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या नवीन धोरणानुसार परफ्यूम, कपडे, बॅग्ज, पादत्राणे आणि अशा अनेक दुकांनांमधून परदेशींना काम करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांना कामावर आणत भागीदारी द्यावयाची योजना आहे. घड्याळाच्या दुकानाप्रमाणे चष्म्याची दुकाने, मेडिकल स्टोअर्स, इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, कार स्पेयर्स पार्टस आदी अनेक प्रकारच्या नोकऱ्यांचा त्यात समावेश आहे.
कामगार आणि समाज कल्याण मंत्री डॉ. अली गल गफिस यांनी या वर्षाच्या सुरुवातील एक आदेश जारी केला आहे. त्याचा परिणाम 30 लाख भारतीयांबरोबरच 1 कोटी 20 लाख परदेशी कामकारांवर पडणार आहे. 30 लाख भारतीय हा सौदीत राहणाऱ्या 1 कोटी 20 लाख परदेशी कामगारांचा सर्वात मोठा घटक आहे त्यात श्रमजीवी (ब्ल्यू कॉलर) कामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.