सेन्सॉर बोर्ड मराठी चित्रपटाच्या मागे लागणारा बागुलबुवा
- पिफ फोरममध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा परिसंवाद
पुणे – चित्रपटांचे “बुकिंग फुल्ल’, पण चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र नाही, हे मी अनुभवले आहे. सेन्सॉर बोर्ड हा मराठी चित्रपटाच्या मागे लागणारा बागुलबुवा आहे, असे मत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. ते “पिफ फोरम’ मध्ये बोलत होते.
17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या “पिफ फोरम’ मध्ये “2018 मधील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवादात मेघराज राजेभोसले, प्रकाश चाफळकर, मंगेश कुलकर्णी, दिग्दर्शक प्रवीण तरडे, भाऊराव कऱ्हाडे, दिग्पाल लांजेकर, विशाल देवरुखकर, निर्माते संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे यांच्याशी यावेळी विनोद सातव यांनी संवाद साधला.
चित्रपटासाठी पैसे देणे एवढीच निर्मात्याची जबाबदारी नसते. त्याने चित्रपटाच्या कथेतील गुणवत्ता आणि चित्रपटाचे वैशिष्ट्ये समजणे महत्त्वाचे असते, असे मत फर्जंद चित्रपटाचे निर्माते संदीप जाधव यांनी व्यक्त केले.
लोकांनी व सरकारने नव्या प्रेक्षकांना, वेगळ्या भाषेला आणि आशयाला स्वीकारले पाहिजे. चित्रपटाच्या आशयाबरोबरच त्याचे विपणनही महत्त्वाचे असते. विविध माध्यमांतून ठरावीक चित्रपट मोठे होतात. मग आमची गुणवत्ता, कल्पकता आणि व्यवस्थापन कौशल्याचे काय? असा सवाल तरडे यांनी यावेळी केला.
निर्माता जगला तरच मराठी सिनेमा बनणार, त्यामुळे निर्मात्यांची काळजी चित्रपट करताना घेतलीच पाहिजे, असे “फर्जंद’चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले.