सिक्कीममध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय जवानांनी मानवी साखळीने रोखली
नवी दिल्ली – चिनी सैनिकांनी सिक्कीममध्ये घुसखोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिनी सैनिक दोन किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत शिरले होते. चीनच्या या सुमारे 50 सैनिकांना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून अटकाव केला आणि परत पाठवून दिले.
पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) चे सुमारे 50 सैनिक भारतीय सीमा पार करून सिक्कीमच्या नाकू जिल्ह्यात घुसले होते. चार तासांहून अधिक काळ परत न जाता ते तेथेच ठाण मांडून बसले होते. भारतीय जवानांनी बॅनर्स दाखवून त्यांना आपल्या भागात परत जाण्यास सांगितले. दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हा आमना सामना परिस्थिती चिघळवण्यास कारणीभूत होऊ शकला असता. सुमारे 100 भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना रोखले होते. अखेर चिनी सैनिक आपल्या ठाण्यांवर परत गेले. मात्र ही घटना नेमकी कधी घडली याची माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, 3488 किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवरची ही घटना अशा प्रकारचे पहिलीच घटना नाही. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर सीमा रेषांवरही वाद होतच असतात. यापूर्वी डोकलाम भागात चिनी आणि भारतीय सैनिक 10 आठवडे तणावपूर्ण स्थितीत आमने सामने होते. चीनने डोकलाम भागात परत हालचाली छुप्या सुरू केल्या असून भारत वा भूतानने त्याबाबत काही कारवाई केली नसल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.