सिंधु नदी पाणी वाटपाबाबत बुधवारी चर्चा
इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधु नदीच्या पाणी वाटपाबाबतची चर्चेची पुढील फेरी बुधवारी लाहोर येथे होणार आहे. पाकिस्तानात नवीन पंतप्रधानांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरची दोन्ही देशांदरम्यानची ही पहिलीच चर्चा आहे.
या चर्चेत भारताच्यावतीने सिंधु पाणी आयुक्त पी. के. सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सहभागी होत असून सक्सेना आजच इस्लामाबादेत त्यासाठी दाखल होत आहेत. दोन्ही देशांमधील या विषयावरील आधीची चर्चा भारतात नवी दिल्ली येथे झाली होती.
दोन्ही देशांमध्ये सन 1960 साली सिंधु नदी पाणी वाटपाविषयी करार झाला आहे. त्यानुसार पाण्याचे प्रमाण आणि प्रवाह इत्यादि विषयांवर या चर्चेत तांत्रिक बाबींवर चर्चा होणार आहे. भारताने या नदीवर दोन धरणे आणि एक जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले असून त्याला पाकिस्तानी बाजूकडून आक्षेप घेतला गेला आहे त्याविषयावरील अधिक चर्चा यावेळी होईल अशी अपेक्षा आहे.