सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू – अमित शहा
नवी दिल्ली – सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे अणि आम्ही हा निर्धार वेळेत पुर्ण करू अशी ग्वाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. येथील एका परिसंवादात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की पंतप्रधानांचे हे विधान केवळ राजकीय हेतूचे नाही तर आम्ही हे उद्दीष्ठ प्रत्यक्षात उतरवू असे ते म्हणाले.
मोदी सरकारने देशातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे असे नमूद करून ते म्हणाले की शेतीसाठी ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्या पहाता 2022 मध्ये उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ठ आम्ही त्याच्या आधीच साध्य करू. स्वातंत्र्यांनंतर कृषी विकास हा केवळ भाषणबाजीचा विषय होता. पण गेल्या दहा पंधरा वर्षात कृषी क्षेत्रात नवनवीन संकल्पनांचा उदय झाला. त्याचा लाभ घेत आता कृषी क्षेत्राचा चौफेर विकास साधला जात असून देशाच्या एकूण उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान सन 2022 पर्यंत 30 टक्क्यांवर जाईल.
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगली पिक विमा योजना राबवली व देशातील युरियाचा काळाबाजार पुर्णपणे थांबवला. अलिकडेच मोदी सरकारने कृषी मालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली असून काहीं पिकांच्या आधारभूत किंमती जवळपास दुप्पट केल्या आहेत असेही ते म्हणाले. कृषी अर्थव्यवस्थेत विमा क्षेत्राचे योगदान या विषयावरील परिसंवादात ते बोलत होंते.