सत्ता कोणाची? पाच राज्यांचे आज निकाल
लोकसभेच्या आगामी निवडणुकीची उपांत्यफेरी म्हणून लक्ष लागलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. सकाळी आठ वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. कोणत्या राज्यात, कोणाची सत्ता याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पाचही राज्यांमध्ये मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या रिंगणात असलेल्या सुमारे 8500 उमेदवारांचे भवितव्य ठरवणारे निकाल आता 1 लाख 84 हजार मतदान यंत्रांमध्ये बंद आहेत.
पाचही राज्यांमधील निकाल केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्ट संदेश देणार असल्याचा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. मतदानोत्तर चाचणीमध्ये किमान चार राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे अंतिम निकालाची प्रतीक्षा केली पाहिजे, असे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
या पाचपैकी तीन राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ही सत्ता कायम राखणे भाजपापुढील मोठे आव्हान होते. तिथे फटका बसला तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांवरही होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाची नव्याने कसोटी पाहणारे हे निकाल असणार आहेत. पण जर एक्झिट पोलनुसार प्रत्यक्षात ही तिन्ही राज्ये काँग्रेसकडे आली, तर तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी मोठा विजय आणि भाजपासाठी त्याहून मोठा पराभव ठरेल.