संततधार पावसामुळे चार राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
- ईशान्य पाण्याखाली
- रस्ते, महामार्ग आणि रेल्वे वाहतुक विस्कळीत
- मदतीसाठी “एनडीआरएफ’ आणि लष्कर पाचारण
अगरताळा – गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे ईशान्येकडील राज्यांमधील सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून आसाममधील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. या राज्यांमधील हजारोजण बेघर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्रिपुरामध्ये राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनासाठी लष्कर आणि एनडीआरएफला पाचारण केले आहे. तेथे पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि मदत पोहोचवण्याच्या कामाला वेग आला आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी पूरग्रस्त उनाकोती जिल्ह्याला भेट दिली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पूरस्थितीच्या गांभीर्याबाबत कळवले.
पूराच्या पाण्याने कालच त्रिपुरातील किमान दोन गावांना वेढले आहे. वस्तीच्या भागात पूराचे पाणी घुसल्याने 14 हजारांपेक्षा अधिक जणांना घर गमवावे लागल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खोवाई जिल्ह्यात एक शेतकरी तर दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात आणखी एक गावकरी पूरात वाहून गेले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देऊ केली आहे.
शेजारील मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शुक्रवारपर्यंत सर्व शाळा कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. इंफाळ आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. तेथील नदीच्या पूरामध्ये दोघेजण वाहून गेले आहेत. राज्यातील प्रमुख नद्यांचा पूर आज जरी ओसरला असला तरी अजूनही पूराचा धोका कायम आहे.
गंभीर पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याने “एनएच-37′ या महामार्गावरील वाहतुक वळवण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठी किमान 15 मदत छावण्या उघडण्यत आल्या आहेत. तर मणिपूरमधील पाण्याखाली गेलेल्या दोन गावांमध्ये अन्न आणि पाणी पोहोचवण्याची जबाबदारी आसाम रायफल्सवर सोपवण्यत आली आहे.
संततधार पावसामुळे आसाममधील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेमार्गावर पाच ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्याने झालेल्या हानीचा अद्याप अंदाज आलेला नाही. लोहमार्गावरील दरडी हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मिझोरामध्येही मुसळधार पाव्सामुळे राज्याच्या दक्षिणेकडील किमान तीन जिल्ह्यांचा उर्वरित देशाबरोबरचा संपर्क तुटला आहे. “एनएच-54′ आणि थेन्झ्वाल मार्ग हे दोन मुख्य महामार्ग बंद करण्यात आले आहेत. मिझोराम आसामसीमेवरील नद्यांना पूर आल्याने या भागातील एकमेव रेल्वे स्टेशन पण्याखाली गेले आहे. त्यामुळे नागरिकांना बोटीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. बांगलादेश सीमेवरील लुंग्लेई जिल्ह्यातही पूराचे पाणी घुसल्याने किमान 60 घरे पाण्याखाली गेली आहेत.