शेतक-यांना सरसकट कर्जमाफीसाठी नरेंद्र मोदीकडे आग्रह करणार – शरद पवार
पुणे – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दृष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज (रविवारी) त्यांनी इंदापूर भागातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या सरसकट माफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी आज इंदापूर भागातल्या काही गावांना भेटी दिल्या आणि दुष्काळी परिस्थितीवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. पवार म्हणाले, दुष्काळाची स्थिती कठिण आहे. शेतकरी संकटात आहे. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं ते म्हणाले.
केंद्रात सध्या काळजीवाहू सरकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा शपथविधी झाला की पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना सरसकट कर्जमाफीसाठी आग्रह धरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी पराभवानंतरही आपले दौरे सुरूच ठेवले आहेत. या दौऱ्यातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.