शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. या मागणीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाठिंबा द्यावा यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव तसेच, किसान सभेचे नेते अतुल अंजान यांचा समावेश होता.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भातील दोन खासगी विधेयकेही मांडली जाणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी दिली जावी तसेच, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला उत्पादन शुल्काच्या दीडपट मूल्य मिळावे अशा मागण्या विधेयकाद्वारे केल्या जाणार आहेत. या विधेयकाला २१ राजकीय पक्षांचे समर्थन असल्याचा दावा या नेत्यांनी केला. देशांतील शेतकऱ्यांनी विशेष अधिवेशनच्या मागणीसाठी १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे दिली तसेच, हजारो ग्रामसभांतही ठराव संमत केला आहे.