शास्त्रीय संगीतातले महान पर्व संपले, ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवींचे निधन
भारतीय शास्त्रीय संगीतात आपला खास ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. शास्त्रीय संगीतातले अलौकिक व्यक्तीमत्त्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या एकांतवासातच गेल्या होत्या. सतार वादनातले त्यांचे कौशल्य अनन्यसाधारण होते. पद्मभूषण या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. आज पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांना गेल्या काही वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रासले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
मध्यप्रदेशातील मैहर या ठिकाणी त्यांचा जन्म 1927 मध्ये झाला. चार भावंडामध्ये अन्नपूर्णा देवी या धाकट्या होत्या. शास्त्रीय संगीताचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. उत्साद बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या त्या कन्या होत्या. सैना-मैहर घराण्यातील सतार वादक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. सरोद वादक आशिष खान, सरोद वादक अमित भट्टाचार्य, सरोद वादक बहाद्दुर खान, सरोद वादक बसंत काब्रा आणि बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया हे अन्नपूर्णा देवींचे शिष्य होते.
अन्नपू्र्णा देवी यांनी पंडित रविशंकर प्रसाद यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव शुभेंद्र शंकर होते, मात्र शुभेंद्र शंकर यांचा मृत्यू 1992 मध्ये झाला. ज्यानंतर अन्नपूर्णा देवी यांनी रविशंकर प्रसाद यांच्यासोबत घटस्फोट घेतला आणि त्यांनी ऋषीकुमार पंड्या यांच्यासोबत लग्न केले. ऋषीकुमार पंड्या यांचा मृत्यू 2013 मध्ये झाला.