breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शास्तीकर सरसकट माफ करा, अन्यथा जनता सोडणार नाही – सचिन साठे
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप-शिवसेनेने शहरातील नागरिकांना संपुर्ण शास्तीकर माफ आणि अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे आश्वासन दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार वर्षात पिंपरी चिंचवडमध्ये येऊन शास्तीकर माफ करु, अशा घोषणा केल्या. तरीही शास्तीकरासह बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे शास्तीकर सरसकट माफ न केल्यास आगामी निवडणूकीत जनता तुम्हाला घरी बसवेल, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने चिखली येथे जनसंपर्क अभियान अंतर्गत झालेल्या बैठकीत साठे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक समितीचे उपाध्यक्ष राजेंदरसिंग वालिया, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जैस्वाल, संयोजक व सरचिटणीस मुन्सफ खान आणि प्रभाग अध्यक्ष मयूर रोकडे, शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवती काँग्रेस शहर अध्यक्षा विनिता तिवारी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, युवक सरचिटणीस तुषार पाटील आणि काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
साठे म्हणाले की, शास्तीकर माफी व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या पोकळ घोषणा मुख्यमंत्र्यांनी शहरात येऊन केल्या. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत नागरिकांची दिशाभूल करणारा व अन्यायकारक आदेश काढला. त्याचा शंभर मिळकतींना देखील फायदा झाला नाही. मात्र, याबाबत साखर, पेढे वाटून, गुलाल उधळून, जाहीरातबाजी, पत्रकबाजी करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांच्या गाजरांना आणि शहर भाजपाच्या पेढ्यांना जनता कंटाळली आहे. आता जर संपुर्ण शास्तीकर माफीचा निर्णय घेतला नाही तर सुज्ञ मतदार भाजप सेनेला माफ करणार नाहीत. असेहि साठे म्हणाले.
स्वागत मुन्सफ खान, सुत्रसंचालन मयुर जैस्वाल आणि आभार मयुर रोकडे यांनी मानले.