वृद्ध आई वडिलांना सोडून देणारांना आता जादा शिक्षा होणार
- तीन ऐवजी सहा महिन्याचा कारावास करण्याचा सरकारचा विचार
नवी दिल्ली – वृद्धावस्थेतील आपल्या मातापित्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना अपत्यांना आता जादा कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते. सध्या असे कृत्य करणाऱ्या अपत्यांना तीन महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेचा कायदा आहे त्यात बदल करून ही शिक्षा आता तीन ऐवजी सहा महिने करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. वृद्ध मातपित्यांच्या रक्षणासाठी सन 2007 साली मेंटेनन्स ऍन्ड वेल्फेअर ऑफ पेरेंट्स ऍन्ड सिनियर सिटीझन नावाचा कायदा करण्यात आला आहे. त्यात दुरूस्ती करून तीन महिन्याची शिक्षा आता सहा महिने करण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्या विचाराधिन असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आता अपत्यांच्या व्याख्येतही अधिक व्यापकता आणण्याचा सरकारचा विचार असून हा कायदा आता वृद्ध मातापित्यांनी दत्तक घेतलेले पुत्र, सावत्र पुत्र, सून, जावई आणि नातवंडे यांनाही लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या मातापित्यांचे कोणतेही रक्ताचे नाते असलेले नातेवाईक या कायद्यात समाविष्ट करून त्यांच्यावरही त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी टाकली जाणार आहे. त्यासाठीच्या नवीन कायद्याचा मसुदा मंत्रालयाने तयार केला असून तो लवकरच मंत्रिमंडळाच्या पुढे सादर केला जाणार आहे. त्याला तेथे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे रितसर कायद्यात रूपांतर केले जाईल. अशा मातापित्यांना दहा हजार रूपयांच्या मदतीची जी मर्यादा घालण्यात आली आहे तीही काढून टाकण्याचा प्रस्ताव असून ती मदत परिस्थितीनुसार वाढवली जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न अधिक आहे त्यांनी त्यांच्या घरातील वृद्धांसाठी जादा पैसे खर्च केले पाहिजेत अशी त्या मागची अपेक्षा आहे. ज्या मातापित्यांना आपल्या अपत्यांकडून बेवारसपणे टाकून देण्यात आले आहे किंवा ज्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाहीं अशा मातापित्यांनी मेंटेनन्स ट्रॅब्युनलकडे दाद मागीतली की त्यांना न्याय मिळू शकणार आहे.