वृक्ष संवर्धनात महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर जावे : वनमंत्री
नाशिक : वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची जागतिक स्तरावर ओळख प्रस्थापित व्हावी म्हणून वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक प्रयत्न करा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे १३ कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक टी.रामाराव, उपायुक्त अर्जुन चिखले, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
२०१६ मध्ये २ कोटी ८२ लक्ष आणि २०१७ मध्ये ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. यावर्षी १३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम घेणे गरजेचे आहे. वन संरक्षणासाठी शासनाने १९२६ या टोल फ्री क्रमांकावर हेल्पलाईन सुरू केली असून आतापर्यंत ४५ हजार तक्रारींची नोंद झाली आहे. तक्रारी तातडीने सोडविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे वनमंत्री म्हणाले.