वृक्ष संवर्धनात अपयश, तरी उद्यान विभागाचे दीड लाख वृक्ष लावण्याचे उद्दीष्ठ
- प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पर्यावरणाचा होतोय -हास
- क्षमता नसताना उद्यान विभागाने वाढविले झाडे लावण्याचे टार्गेट
पिंपरी, (महाईन्यूज) – शहर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्मार्ट सिटीबरोबर ग्रीन सिटीचा नारा देत पालिकेच्या उद्यान विभागाकडून दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. मात्र, वृक्षाच्या संवर्धनाची माहिती देण्यास उद्यान विभागाच्या अधिका-यांचे हात धजावताना दिसत नाहीत. जर वृक्षांचे संवर्धन सक्षमपणे होत नसेल तर लागवडीचे उद्दीष्ठ वाढविण्याचा अट्टाहास कशाला केला जातो, असा प्रश्न निर्माण आहे. क्षमता नसताना पुन्हा यावर्षी या विभागाने दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ समोर ठेवले आहे.
- पावसाळा सुरू झाला की उद्यान विभागाची झाडे लावण्याची लगबग सुरु होते. गेल्या वर्षी 50 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष महापालिकेने ठेवले होते. त्यापैकी सुमारे 45 हजारच वृक्ष लागवड झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यात यंदा महापालिका उद्यान विभागाने वृक्ष लागवडीचे उदिष्ट तिप्पटीने वाढविले आहे. शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात थेट 1 लाख 50 हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे. महापालिका उद्यान विभागाकडून खड्डे खोदणे, वृक्ष लागवडीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होताच ही रोपे लावली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक शहराच्या हद्दीत असलेल्या लष्करी हद्दीमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. संरक्षण विभागाच्या औंध येथील इन्फ्रिक्ट ब्रिगेड कॅम्पातील 100 एकर जागेत 35 हजार झाडे, तर मिलिटरीच्या देहूरोड, तळवडे स्टेशन हेडक्वॉटरच्या 100 एकर जागेत 30 हजार, दिघी मॅग्झिन जवळील संरक्षण खात्याच्या 50 एकर जागेत 35 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासह पालिकेच्या मोकळ्या जागा, शाळा, पोलिस ठाणे, क्रिडांगणे, पालिका मिळकती आदींच्या परिसरात 30 हजार झाडे लावली जाणार आहे. गृहरचना सोसायट्या, सार्वजनिक संस्था, नागरिकांना लागवडीसाठी रोपांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून मिळाली आहे.