विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या कामगिरीचे म्यूल्यमापन होणार
नवी दिल्ली- वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हैदराबाद येथे 10 आणि 11 ऑक्टोबरला प्रशासकीय समितीचे सदस्य आणि संघ व्यवस्थापक यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद हेही उपस्थित असणार आहेत. या वेळी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीचे प्रशासकीय समितीकडून मूल्यमापन करण्यात येणार आहे.
या बैठकीत प्रशासकीय समिती संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहे. दक्षिण आफ्रीका, इंग्लंड आणि आशिया चषक दौऱ्यातील संघाच्या कामगिरीवर चर्चा तसेच खेळाडूंच्या कामगिरीचे मुल्यमापण यावेळी केले जाणार आहे. या बैठकीत कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे उपस्थित असणार आहेत. तसेच निवड समिती प्रमुख प्रसादही यावेळी उपस्थीत असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रवी शास्त्री आणि कोहली यांच्यासोबतची प्रशासकीय समितीची ही दुसरी बैठक आहे. भारतीय संघाला परदेशात चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराटसेनेला आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत 1-2 असा, तर इंग्लंड दौऱ्यावर 1-4 असा पराभव पत्करावा लागला होता. परदेश दौऱ्यातील भारतीय संघाने केलेल्या खराब कामगिरीवर मध्यंतरी बीसीसीआय व क्रिकेट प्रशासकीय समिती नाराज असल्याची माहिती होती. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीचा भारतीय संघ गेल्या 15-20 वर्षातला सर्वोत्तम संघ असल्याचे जाहीर करत संघाची पाठराखण केली. मात्र, हैदराबादमध्ये होणाऱ्या बैठकीत परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी केलेली हाराकिरी, प्रमुख खेळाडूंचा ढासळलेला फॉर्म यावर चर्चा होणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे या बैठकीचा भारतीय संघाच्या भवितव्यावर काय परिणाम होतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.