वारीत सोनसाखळी हिसकावणारे तिघे अटकेत; दागिने केले जप्त
पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वारकरी व स्थानिक नागरिक पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या गर्दीचा फायदा उठवत सोनसाखळी चोरांनी डाव साधला आहे. यातील तीन सोनसाखळी चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांकडून 95 हजारांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
यामध्ये दिघी पोलिसांनी राधेशाम बन्सी आमटे (वय-29, रा. खांडे पारगाव, बीड) तर स्थानिक गुन्हे शाखेने शंकर शिवाजी पवार (वय-21) आणि महेंद्र सुरेश आरगडे (वय-24, दोघे रा. पाथर्डी, जि. नगर) अशा तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
एका घटनेत वारकऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना चोरट्यांना पकडले. ही घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास देहूगावातील माळवाडी येथे घडली. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानच्या वेळी एका 60 वर्षीय वारकऱ्यांच्या गळ्यातील 45 हजार रूपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. सीसीटीव्ही कॅमेरॅत चोरटे जेरबंद झाले. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेली साखळी पोलिसांनी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते नगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दिघीत चोरट्यांना नागरिकांचा हिसका
दुसऱ्या घटनेत दिघी फाटा येथे राधेशाम बन्सी आमटे (वय-29, रा. खांडे पारगाव, बीड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात रंजना विलास धनवडे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना धनवडे या माउलींच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 40 हजार रुपयांचे मंगळसूत्र आमटे याने हिसकावून घेतले. नागरिकांना संश्य येताच आमटे याला पकडले व दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले.