वारणा नदीवरील मांगले-काखे नवीन पुलाचा मार्ग मोकळा; केंद्राकडून 12 कोटींचा निधी मंजुर
- आमदार शिवाजीराव नाईक यांचा पाठपुरावा
- पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार
शिराळा (प्रतिनिधी) – सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला वारणा नदीवरील मांगले-काखे या नवीन पुलाच्या कामासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटी रुपये केंद्र सरकारच्या केंद्रीय मार्ग निधीमधून मंजूर झाले असल्याची माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिली.
याबाबतची माहिती देताना आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या नवीन पुलाच्या कामासाठी केंद्र सरकारने विशेष करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. वारणा पट्यातील गावांसह मांगले, देववाडी तालुक्याचे ठिकाण शिराळा, व इतर गावे व वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना कोडोली-वारणानगर कोल्हापूर या बाजारपेठा जवळ पडतात. तर कोकणात जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच, विद्यार्थांना शाळा कॉलेजसाठी व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी देखील या पुलावरून ये-जा करावी लागते.
पावसाळ्यात वारणा नदीवरील जुना पूल नेहमी पाण्याखाली जातो. यामुळे दुध वाहतूक, शाळा, कॉलेज, व इतर कामासाठी विद्यार्थी आणि नागरीकांना पुलावर पाणी आले की अडचणीचे होते. मग त्याना यापूर्वी आम्ही केलेल्या चिकुर्डेच्या पुलावरून वळसा घालून थोडेसे लांबून पलीकडे वारणानगर, कोल्हापूर जिल्ह्यात जावे लागते. मांगले आणि परिसरातील नागरीकांची मांगले- काखे पुलाच्या कामाबद्दल सातत्याने मागणी होती. या मागणीचा विचार करून आम्ही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने हा पूल व्हावा म्हणून आग्रह धरला होता. त्यानुसार मांगले – काखे या नवीन पुलाच्या कामासाठी त्यांनी विशेष बाब म्हणून १२ कोटी रुपये केंद्रीय मार्ग निधी मधून मंजूर करून दिले आहेत, असेही आमदार नाईक म्हणाले.
कामाची निविदा लवकरच निघणार
या पुलाच्या मंजुरीबरोबरच मतदारसंघातील वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना, वाघवाडी येथील एमआयडीसी रद्द, गिरजवडे तलाव, शिराळ्याचे उपजिल्हा रुग्णालय, चांदोली पर्यटन विकास, मस्त्यबीज उत्पादन केंद्र, लाडेगाव-चिकुर्डे हा वारणा नदी पर्यंतचा रस्ता, वीज वितरण कंपनीचे दोन सब स्टेशन, चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, बीएसएनएलचे टॉवर तसेच मतदारसंघातील अनेक रस्त्यांचा दर्जा वाढवून कामे पूर्णत्वास आलेली आहेत. अशा प्रकारच्या अनेक विकासकामांची प्रतीपुर्ती आम्ही निवडणुकीमध्ये दिलेल्या अश्वासनानुसार भाजपा सरकारच्या माध्यमातून झालेली दिसून येत आहे. या पुलाच्या कामासाठी लवकरच निविदा निघून प्रत्यक्ष कामाला पावसाळा संपताच सुरवात होईल. पुलाच्या कामाला भरघोस निधी उपलब्ध झाल्यामुळे येथील विद्यार्थी, वाहनधारक, प्रवास करणारे लोक व इतर जनतेमध्ये समाधानचे वातावरण आहे.
————–