लोकसभा निवडणूक होईपर्यंत कुणीही मला हात लावू शकत नाही
- कुमारस्वामी: किमान वर्षभर तरी पदावर राहीन
बंगळूर – स्थापनेपासूनच कर्नाटकमधील जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकार किती काळ टिकेल, याबाबत चर्चा झडत आहेत. यापार्श्वभूमीवर, पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक होईपर्यंत कुणीही मला हात लावू शकत नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर कर्नाटकात मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्या. त्यानंतर कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकार स्थापन झाले. एकमेकांविरोधात निवडणूूक लढलेले जेडीएस आणि कॉंग्रेस हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. त्यामुळे आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत सुरूवातीपासूनच साशंकता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे अनेक आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी आघाडी सरकारच्या दृष्टीने मोठीच डोकेदुखी ठरत आहे. यापार्श्वभूमीवर, आज येथे एका कार्यक्रमात बोलताना कुमारस्वामी म्हणाले, किमान एक वर्ष मला कुणी हात लावणार नाही याची मला खात्री आहे. लोकसभा निवडणूूक आटोपेपर्यंत तरी मी पदावर राहीन. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यावर मी लक्ष केंद्रित करेन. मला मिळालेल्या संधीतून माझ्या कार्याच्या माध्यमातूून मी संदेश देईन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.