breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

रोहिंग्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये हात: स्यू की

नवी दिल्ली : ‘गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था व स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जगाच्या निंदेला आम्ही घाबरत नाही,’ अशी ठाम भूमिका म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी मांडली आहे.
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविरोधात तेथील लष्करानं धडक कारवाई सुरू केली असून त्यामुळं हजारो रोहिंगे शेजारच्या देशात पलायन करत आहेत. या घटनाक्रमानंतर जागतिक मानवी हक्क संघटनांसह काही देशांकडून म्यानमार सरकारवर टीकेचा भडिमार होत आहे. या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य केलं. ‘गेल्या वर्षभरापासून मुस्लिम कट्टरपंथीयांकडून पोलीस ठाण्यांना लक्ष्य केलं जात आहे. आताचा हिंसाचार २५ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यावर रोहिंग्या मुसलमानांनी केलेल्या हल्ल्यामुळंच भडकला आहे. अनेकांची घरंही जाळण्यात आली. त्यामुळं रोहिंग्या साल्वेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं,’ असं स्यू की म्हणाल्या.
‘म्यानमारमध्ये मानवी हक्कांच्या पायमल्ली होत असेल तर ते चिंताजनक आहे. मात्र, एका घटनेवरून म्यानमारबद्दल रंगवलं जाणारं चित्र चुकीचं आहे. जगानं एका छोट्या भागातील हिंसाचारावरून म्यानमारचं मूल्यमापन करू नये. म्यानमारकडं देश म्हणून पाहावं,’ असं आवाहन त्यांनी केलं. ‘हिंसाचारानंतर ज्यांना आपली घरं सोडावी लागली, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. देशात परतण्याची इच्छा असलेल्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये आजही अनेक गावांमध्ये मुस्लिम राहत आहेत. हिंसाचारानंतरही त्यांनी आपली गावं, घरं सोडलेली नाहीत. हवं असल्यास आंतरराष्ट्रीय समुदायानं म्यानमारमध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. आम्ही घाबरत नाही,’ असं त्या म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button