राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत: प्रकाश आंबेडकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत, अशी बोचरी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच राज्यातील भाजपा सरकारने मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप केला होता. ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता. राज ठाकरेंना डोके नाही. ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता, असे त्यांनी सांगितले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपाने आरक्षण दिले. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपाच्या जागा १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. पण मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही, असा टोला त्यांनी लगावला. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
‘पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या देशात राम मंदिरच्या मुद्दयांवर दंगली घडविण्यासाठी ओवेसी सारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण ह्या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक लढवायची आहे’, असा दावा राज ठाकरेंनी केला होता.
ओवेसींचा पलटवार
राज ठाकरेंच्या आरोपांवर असदुद्दीन ओवेसींनी प्रतिक्रिया दिली होती. ‘राज ठाकरेंचा आलेख आता घसरत आहे. ओवेसी ही एखादी टॅबलेट असावी किंवा माझं नाव घेऊन त्यांच्या अंगात बळ येत असावे. राजकारणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जात आहे, असे त्यांनी सांगितले होते.