रस्ते अपघात बळींमध्ये देशात महाराष्ट्र तिसरा
मुंबई : अपघाती मृत्यू होण्यात महाराष्ट्र देशात तिसर्या क्रमांकावर असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यात गेल्या वर्षात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांची संख्या 12 हजार 264 आहे. अपघातात मृत्युमुखी पडणार्या वा जखमी होणार्यांमध्ये 25 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी आहे.
राज्यात 23 एप्रिलपासून रस्ते सुरक्षा विशेष मोहिमेला सुरुवात होत असून, अपघातांचे भयावह प्रमाण पाहता ही संख्या घटविण्यासाठी प्रबोधनाची मोहीम राबविली जाणार आहे. राज्यात 3 लाख 28 हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातून येणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. राज्यातील वाहनांची मोठी संख्या व बाहेरच्या राज्यातून येणारी वाहने यावर प्रभावी नियंत्रण हेच यंत्रणेसमोरचे मोठे आव्हान आहे.
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी 35 ठिकाणी ब्रेक तपासणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली असून, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासण्यासाठी स्वयंचलित चाचणी केंद्रही सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये 108 ट्रॉमा केअर सेंटर व 108 क्रमांकाच्या 937 रुग्णवाहिका 24 तास सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.