breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
युतीतले पक्ष म्हणजे राजकीय क्षेत्राला कलंक – अजित पवार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – युतीने केंद्रात राज्यात पाच वर्षे सत्ता राबविली, तरी त्यांना लोकसभेला उमेदवार मिळेनात. म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवार घेत आहेत. युतीतील पक्ष म्हणजे राजकीय क्षेत्राला लागलेला कलंक आहे, अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी (दि. 29) अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ व भोसरी लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, आता देशात वातावरण बदलले आहे. भाजपाच्या व युतीच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे. शेतक-यांना कर्ज माफी दिली नाही. रोजगारात वाढ होण्याएैवजी कमी होत आहे. शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. महागाई रोज वाढत आहे. या सरकारच्या विरोधात बोलणा-यांना चौकशीची भीती दाखविली जाते. समाजात अस्वस्थता आहे. हे सर्व रोखण्यासाठी आता केंद्रात आणि राज्यातही आघाडीचे सरकार आले पाहिजे. ‘मी’ म्हणजेच भारत हि मोदींची प्रतिमा लोकशाहीला घातक आहे. अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे माहात्मा गांधी आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वसा घेऊन चालणा-या महाराष्ट्रात अजूनही ‘नथूरामाच्या’ प्रवृत्ती जीवंत आहेत. हे दुर्दैव आहे, अशी टिका पवार यांनी केली.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता एकजूटीने प्रचाराला लागले पाहिजे. माझी राजकारणातली पहिली निवडणूक मी ‘पंजा’च्या चिन्हावर विजयी झालो असल्याची आठवणही यावेळी अजित पवार यांनी सांगितली.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, मावळ व शिरुर लोकसभेतून आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते दिवस-रात्र प्रचार करतील. प्रचाराच्या नियोजनासाठी शहर पातळीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकत्रित समन्वय समिती स्थापन करण्याची गरज आहे.
स्वागत सचिन साठे यांनी केले. सूत्रसंचालन मयूर जयस्वाल यांनी केले. आभार विष्णूपंत नेवाळे यांनी मानले.