मोदी जनतेचे नव्हे अनिल अंबानी, नीरव मोदीचे चौकीदार : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मै भी चौकीदार या मोहिमेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. मोदी जनतेचे नव्हे तर अनिल अंबानी आणि नीरव मोदीचे चौकीदार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
राजस्थानातील श्री गंगानर येथे प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की मी चौकीदार आहे. मात्र, ते कोणाचे चौकीदार आहेत हे त्यांनी कधीही सांगितले नाही. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घरी, बेरोजगार तरुणांच्या घरी चौकीदार पाहिला आहे का? अंबानींच्या घरी किती चौकीदार आहेत? चौकीदारांची तिथे रांग लांगली आहे.
राहुल म्हणाले, गेल्या ५ वर्षात नरेंद्र मोदींनी गरीबांना मदत करणाऱ्या योजनांना विरोध करण्याबरोबरच त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. मनरेगाला त्यांनी खड्डे खणण्याची योजना म्हणून हिणवलं. मात्र, त्यांना हे कधीच कळलं नाही की, या योजनांनी १४ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. म्हणजेच ज्या लोकांना काँग्रेसने गरीबीतून बाहेर काढले त्यांना मोदींनी गेल्या ५ वर्षांत त्या सर्वांना पुन्हा गरीब बनवून टाकले.
जनतेला १५ लाख मिळाले नाहीत, २ कोटी नोकऱ्याही मिळाल्या नाहीत. शेतकऱ्यांची कर्जेही माफ झाली नाहीत. तसेच जनतेने आपल्या घरांमध्ये जो पैसा वाचवून ठेवला होता तोही मोदींनी नोटाबंदी करुन हिसकावून घेतला, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
काँग्रेसचे सरकार जर सत्तेत आले तर भारतातील २० टक्के गरीबांच्या बँक खात्यात प्रतीवर्षी ७२,००० रुपये जमा करेल. म्हणजेच काँग्रेस ५ वर्षात ३,६०,००० रुपये गरीबांच्या बँक खात्यात जमा करुन दाखवेल. बँकांचे दरवाजे आम्ही छोटे दुकानदार, छोट्या व्यापाऱ्यांसाठी खोलणार आहोत. नीरव मोदी, अनिल अंबानी यांच्याकडून बँकांची चावी हिसकावून आपल्या हातात सोपवणार आहोत, असे आश्वासन यावेळी राहुल गांधींनी राजस्थानच्या जनतेला दिले.