मोदींनी भारतमाता नव्हे तर ‘नीरव मोदी, अनिल अंबानी की जय’ म्हणावं: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘भारत माता की जय’ ऐवजी ‘नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या की जय’ असं म्हणायलं हवं, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. मोदींना जर खरंच भारतमातेचा जयजयकार करायचा असता तर ते शेतकऱ्यांना कधीच विसरले नसते, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानमधील अलवार येथे प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात कधीच राफेल करारासंदर्भात बोलत नाही. जर ते काही बोलले तर लोकंच ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देतील, असा दावाही त्यांनी केला.
मोदींनी कल्याणकारी योजना खरंच राबवली का?, सर्व पैसा हा भ्रष्टांकडे जात आहे, ज्यांनी देशाला लुबाडलं ते देश सोडून पळून गेले आहेत. आता सरकारने कल्याणकारी योजनांचे नाव बदलून नीरव मोदी योजना, अंबानी योजना असे ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला. देशातील उद्योगपतींनी मोदींना सत्तेत आणले. जनतेच्या पैशांमधून त्यांना उद्योगपतींनी पंतप्रधानपदी बसवले, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
काँग्रेसची सत्ता असताना गॅस सिलिंडर ३६० रुपयांमध्ये उपलब्ध होते. आता भाजपाच्या काळात गॅस सिलिंडरचे दर काय ?, मोदीजी काँग्रेसच्या काळात इंधन, गॅस याचे दर काय होते यावर कधीच भाष्य करत नाही. त्यांनी लोकांना लाभापासून वंचित ठेवले, असा आरोपही त्यांनी केला.
मोदींनी देशातील दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. जर रोजगार मिळाला असता तर अलवारच्या चार तरुणांनी आत्महत्या का केली असती?, वसुंधरा राजे सरकारला आता राजस्थानमध्ये भविष्य उरलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.