मोदींनी इम्रान खान यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करावे, काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांना पाठवलेल्या कथित पत्रावरून काँग्रेसने मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानबाबत स्पष्ट धोरण न ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करण्याची मागणी केली.
या पत्रात नरेंद्र मोदी यांनी द्विराष्ट्रीय चर्चा पुन्हा सुरू करण्याविषयी प्रस्ताव मांडल्याचे व त्यासाठी नव्या पाक पंतप्रधानांस निमंत्रण दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांपैकी अनेकांनी दिले. मग रात्री उशिरा कधी तरी पाकिस्तानकडूनच अशा प्रकारे मोदींनी प्रस्ताव मांडल्याचा इन्कार करण्यात आला. त्यामुळे नेमकं चित्र स्पष्ट होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे पत्र सार्वजनिक करावं अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. भारत पाकिस्तान संबंधाबाबत होणाऱ्या घडामोडी जनतेलाही समजायला हव्यात. पण हे सरकार पत्र सार्वजनिक करणार नाही हे आपल्याला माहितीये असंही ते म्हणाले.
नवज्योत सिंग सिद्धू इम्रान खान यांच्या शपथविधीला गेले होते, या मुद्द्यावर बोलताना तिवारी यांनी तो सिद्धू यांचा वैयक्तीक निर्णय होता. पण, मुळात मुख्य मुद्दा भारत- पाकिस्तान संबंध हा आहे. पाकिस्तानबाबत भारत सरकारचं धोरण काय आहे. गेल्या चार वर्षांमधील सरकारच्या कामगिरीकडे लक्ष दिलं तर भाजपा सरकारचं पाकिस्तनाबाबत कोणतंच धोरण नसल्याचं स्पष्ट होतं, अशी टीका काँग्रेसने केली.