मोदींच्या “स्वच्छ भारत अभियान”ला पालिकेचा हरताळ
- उद्यान स्वच्छतेचा गंभीर प्रश्न
- ठेकेदार पोसण्याचा प्रशासनाचा उद्योग
पिंपरी – पालिकेने आपल्या शहरातील उद्यानाची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. मात्र, ठेकेदार दुरूस्ती व सफाईचे काम करत नसल्यामुळे चिंचवड भागात साथीचे रोग वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष नकुल भोईर यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर पालिकेने ठेकेदार बदलले. भाजप सत्ता काळात परिवर्तन होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शहरात अनेक ठिकाणी उद्यानांची साफसफाई आणि देखभाल दुरूस्तीसाठी नेमलेले ठेकेदार काम करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. याकडे उद्यान निरीक्षक व संबंधीत ठेकेदार सुपरवायझर यांचे दुर्लक्ष आहे.
चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 18 मधील उद्यानाचा ठेका हरिदास लेबर सप्लायर्स यांना दिलेला आहे. नागरिकांच्या कराच्या पैश्यातून महिना 15 हजार पालिका ठेकेदारास देते. मात्र, तेथे स्वछता केली जात नाही. झाडू मारला जात नाही, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. सध्या शहरात साथीचे आजार वाढलेले आहेत. नागरिकांचे बळी जात आहेत. अश्यावेळी प्रशासन उपाय योजना करत नसल्यामुळे उद्यानांची अवस्था बिकट झाली आहे.
माणिक कॉलनीतील गणेश उद्यानाबाबत उद्यान निरीक्षक अडागळे व संबंधित ठेकेदाराला आम्ही 4 दिवसांपूर्वी तक्रार केली होती. उद्यानात गणेश मंदिर आहे, गणपती बसल्यानंतरही स्वच्छता केली नाही. अधिकारी ह्यांनी जबाबदारी घेतली होती. दोन दिवसांत स्वच्छता केली जाईल, असा शब्द दिला होता. आज गणेश विसर्जन झाले असताना देखील उद्यानात स्वच्छता केलेली नाही. याठिकाणी सहा फुट लांब सर्प भटकत असून उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना दंश झाल्यास, कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न भोईर यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.