मुंबई, पुण्यात घातपाताचा कट होता
महाराष्ट्र – संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून धक्कादायक बाबी उघड
संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात घातपाताची तयारी सुरू केली होती. तेथील कारवायांचे परिणाम पाहून पुढील टप्प्यांत राज्यात तसेच परराज्यातील काही भागांत कारवायांसाठी आखणी केली जाणार होती, अशी माहिती संशयित हिंदूत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून पुढे आली आहे.
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या अटकेनंतरच्या प्राथमिक चौकशीत शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर यांनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कट आखल्याची माहिती पुढे आली होती. पुढील चौकशीत आरोपी या कारवाया टप्प्याटप्प्याने करणार होते. सर्वप्रथम मुंबई आणि पुणे येथे कारवाया करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यासाठीची तयारी सुरू केली गेली.
अटकेतील आरोपींच्या नालासोपारा आणि सोलापूर येथील ठिकाणांहून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके हस्तगत केली गेली. यात पॉयझन असे लिहिलेल्या दोन काचेच्या बाटल्या, चाकू, सुरे या वस्तूही सापडल्या. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब, स्फोटके, शस्त्रसाठय़ात विषारी द्रव्य कशासाठी, कोयते किंवा सुरे कशासाठी याबाबतही आरोपींकडे कसून चौकशी करण्यात आली. अतिरेकी कारवायांना आवश्यक पैसे उभे करण्यासाठी आरोपींनी खंडणी, अपहरण, हत्येची ‘सुपारी’ आदी गुन्हे केले होते का किंवा ते करण्याच्या तयारीत होते का याबाबतही चौकशी केली गेली. मात्र आतापर्यंतच्या चौकशीतून अशा गुन्हयांची माहिती पुढे आली नाही.
विषारी डाव..
आरोपी प्रत्येक ठिकाणी भिन्न कारवाया करण्याच्या बेतात होते. कुठे कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट तर कुठे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी दंगली किंवा हत्या घडविण्याचा विचारही आरोपींनी केला होता. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची हत्या घडविण्याचाही कट होता, अशी माहिती एटीएसच्या चौकशीतून पुढे आली आहे.
‘त्या’ बॉम्बबाबत सखोल चौकशी
१० ऑगस्ट रोजी एटीएस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम नालासोपारा येथील भंडारआळीतील वैभव राऊत याच्या घरी छापा घातला. तेव्हा राऊतच्या घरातील लाकडी पलंगात आठ गावठी बॉम्ब आणि अन्य स्फोटके सापडली. तर उर्वरित बॉम्बगोळे घराजवळील दुकानाच्या गोदामातून हस्तगत केले गेले.
गोदामात सुरक्षित असलेल्या साठय़ातील आठ बॉम्ब राऊतने स्वत:च्या घरी का आणले, याबाबतही एटीएसने आरोपींकडे सखोल चौकशी केल्याचे समजते.