मुंबई, ठाण्यासह राज्यात दमदार पाऊस
मुंबई: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने रविवारी पहाटेपासूनच मुंबई, उपनगरे, ठाणे, कोकणसह राज्यातील विविध भागांत दमदार हजेरी लावली. मुंबईतील सायन आणि कुर्ला येथे सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते.
मुंबईत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. परळ, वरळी, दादर परिसरात मध्यम आणि हलक्या सरी कोसळल्या. तर अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडुप, सायन, कुर्ला परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. सायनमधील गांधी मार्केटमधील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. तसेच कुर्ला भागात पावसाचे पाणी साचले होते.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार या भागातही जोरदार बरसला. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात झाड कोसळून वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आज आणि उद्या, सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात पहाटेपासूनच पावसाने बरसण्यास सुरुवात केली. अनेक भागांत दमदार पाऊस झाला. नाशिकमध्येही मुसळधार पाऊस कोसळला. अहमदनगरमध्ये भंडारदरा धरण परिसरात दमदार हजेरी लावली. अलिबाग, उरण आणि रत्नागिरीमध्ये हलक्या सरी कोसळल्या.