मुंबईकर खेळाडूने ‘वीरूष्का’सोबत साजरा केला भारताचा विजय
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना ३१ धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने पहिल्यांदाच मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात चेतेश्वर पुजाराची पहिल्या डावातील शतकी खेळी आणि दुसऱ्या डावातील पुजारा – रहाणे जोडीची भागीदारी या बाबी महत्वाच्या ठरल्या. त्यामुळेच भारताला हा विजय मिळवणे शक्य झाले. या सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी पहिल्या डावात निराश केले. त्यामुळे पुढच्या सामन्यात या दोघांपैकी एका खेळाडूला संघाबाहेर करून त्याच्या जागी मुंबईकर पृथ्वी शॉची संघात वापसी होऊ शकते असे मत व्यक्त केले जात आहे.
पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. पण भारत विजयी झाल्यांनतर पृथ्वीने कर्णधार विराट कोहली आणि त्याची अनुष्का शर्मा या दोघांबरोबर हा विजय साजरा केला. पृथ्वी शॉ ने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर तिघांचा फोटो पोस्ट केला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान सीमारेषेवर झेल पकडत असताना पृथ्वी शॉला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर उचलून न्यावं लागलं होतं. पण ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी पृथ्वी शॉ मैदानावर धावण्याचा सराव करताना दिसला. तसेच आपल्याला मैदानात खेळायचंय ही इच्छा त्याच्या मनात आहे. पुढील काही दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यास आम्ही त्याला पर्थ कसोटीमध्ये खेळवू शकतो, असे सूचक वक्तव्य रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियातील एका रेडियो चॅनलने दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यामुळे पर्थच्या कसोटीत पृथ्वीची वापसी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.