मी आठवले पण युतीत मलाच विसरले – रामदास आठवले
कोल्हापूर – राज्यात भाजप शिवसेनेची युती झाली, मात्र या युतीत आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही. माझे नाव आठवले पण युतीवाले मला विसरले, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.
आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, भाजप शिवसेनेला मी सोडलेले नाही याचा अर्थ त्यांनी मला सोडावे असे नाही. राज्यात आम्हाला एकतरी जागा सोडावी. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. जागा न सोडल्यास मतांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. युतीची सत्ता राहावी अशी आपली इच्छा आहे. मात्र जागा न सोडल्यास सत्ताही राहणार नाही, असा इशाराही आठवले यांनी दिला.
आठवले म्हणाले, गेल्या पाच वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांचा धडाका लावला. यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. त्यामुळे ते पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. काँग्रेसचे राहूल गांघी यांची पंतप्रधान होण्याची अद्याप क्षमता नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूकीनंतर आधी विरोधी पक्षनेता होण्याचा अनुभव घ्यावा. काँग्रेसच्या जागा साठ ते सत्तरच्या पुढे जाणार नाहीत. याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे.