मावळमधून उमेदवारी मिळाल्यानंतर बघा काय म्हणाले पार्थ पवार
पिंपरी ( महा ई न्यूज) – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे आज पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पहिल्यादाच प्रतिक्रिया जाहीर पत्रकांद्वारे व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी म्हणजे पार्थ पवार थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मावळ मतदार संघातील त्यांनी गाठी-भेटी सुरु केल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चिती मानली जात होती. पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर पत्रकाद्वारे संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे, वडील अजित पवार आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळत असल्याचा आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
काय म्हणाले पार्थ पवार त्यांच्याच शब्दात…
शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्याची सुरुवात करत आहे. आशाताई पवार आणि अनंतराव पवार यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. पक्षाने आज माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया ताई, प्रफुल पटेल जी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रवक्ते नवाब मलिक या सर्वांचे मनापासून आभार मानतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (क) आणि सर्व मित्रपक्ष यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल त्यांचेही आभार! मावळ लोकसभा मतदार संघातील आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याने माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होत आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच पवार कुटुंबियांवर भरभरुन प्रेम केलं आहे. तसंच प्रेम आणि आशीर्वाद मलाही लाभेल, अशी अपेक्षा बाळगतो. माझ्यावर पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी सोपवली आहे, ती योग्यरीत्या पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन आणि मावळच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन.
जय हिंद! जय महाराष्ट्र!