माजी पंतप्रधान ‘अटलबिहारी वाजपेयी ‘ यांचे निधन
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली.
एम्स रुग्णालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांचे प्रदीर्घ आजारपणाने निधन झाल्याची माहिती देण्यात आली. मूत्रपिंड संसर्गामुळे ते ११ जूनपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जावून वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आज सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची रुग्णालयात जाऊऩ विचारपूस केली होती. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजप खासदार मीनाक्षी लेखी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही बुधवारी रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेतली होती.
किडनीला झालेल्या संसर्गामुळे ११ जून रोजी वाजयेपी यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २००९ मध्ये वाजपेयी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता. अटलबिहारी वाजपेयी यांना भारतातील अत्यंत चतुर राजनीतिज्ञांपैकी मानले जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या वाजपेयी यांची प्रतिमा सौम्य मध्यममार्गी अशीच कायम राहिली. वाजपेयी यांचे बालपण, कुटुंब, लहानपणापासून संघाशी एकरूपता, अभिजात वाङ्मय व काव्याची आवड, काही काळ डाव्या विचार चळवळींचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, वाजपेयी यांचे महाविद्यालयीन जीवन व राजकारणातील प्रवेश, 1955 पासून संसदेतील त्यांचा वावर, त्यांची प्रभावी भाषणे, नेहरू व वाजपेयी, वाजपेयी-मधोक, वाजपेयी- इंदिरा गांधी यांचे संबंध, 1973 ते 1977 मधील खळबळजनक वर्षे, आणीबाणी, त्यानंतरचे भारतीय राजकारणातील वाजपेयी यांचे नेतृत्व, त्यांचे वक्तृत्व, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची विचारसरणी, भाजपच्या सत्तेच्या काळातील घटना या सर्वांच्या स्मरणात राहणाऱ्या आहेत.