मल्याळम अभिनेत्रींनी केले बंड
चित्रपटसृष्टीमध्ये “कास्टिंग काऊच’ ही संज्ञा गेल्या वर्षभरापासून वापरात यायला लागली. लैंगिक शोषण ही एक सार्वत्रिक समस्या बनायला लागली आहे. दक्षिणेकडच्या चित्रपटांमध्ये याचे उघड चित्र बघायला मिळते आहे. मात्र या लैंगिक शोषणाच्याविरोधात मल्याळम अभिनेत्रींनी आता एल्गार पुकारला आहे.
मल्याळम चित्रपटांमधील कलाकारांची संघटना असलेल्या “असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’मधील अभिनेत्रींनी बुधवारी अचानक आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली आहे. अभिनेत्रींची संघटना असलेल्या “वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’मधील रीमा, गीतू, रेमया आणि अन्य काही ऍक्ट्रेसनी या संघटनेचा राजीनामा दिला आहे. बलात्काराचा आरोप असलेला दिलीप या अभिनेत्याला पुन्हा एकदा “एएमएमए’मध्ये घेण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे बंड पुकारले आहे. या तिघींशिवाय आणखी एका ऍक्ट्रेसनेही राजीनामा दिला आहे. मात्र तिचे नाव उघड केले गेलेले नाही. या ऍक्ट्रेसवर गेल्यावर्षी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून ती बचावली होती.
दिलीपने आपल्याला मिळालेली अभिनयाची संधी हिरावून घेतली. याबाबत “एएमएमए’कडे तक्रार केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट कलाकारांच्या या संघटने दिलीपला वाचवण्याचाच प्रयत्न केला होता, असा आरोपही या ऍक्ट्रेसने केला आहे. त्यामुळेच अशा संघटनेचे सदस्य असण्यात काहीही अर्थ नसल्याचे लक्षात आल्याचे तिने म्हटले आहे.
या हल्ल्याच्या घटनेनंतर लगेचच “वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ या ऍक्ट्रेसच्या संघटनेची स्थापना झाली होती. दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्यासह रिमा कलिंगल, रेमया नामबिशान या अभिनेत्रींनी पुढाकार घेऊन ऍक्ट्रेसच्या हितासाठी ही संघटना स्थापन केली. एका अभिनेत्रीवरील हल्ल्यानंतर दिलीपला अटक झाली आणि त्यानंतर कलाकारांच्या संघटनेतून हाकलण्यात आले होते.
मात्र या कलाकारांच्या संघटनेचे अध्यक्षपद मोहनलाल यांच्याकडे आल्यावर दिलीप याला या संघटनेमध्ये पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. दिलीपनी सिनेविश्वातून मोठी सहानुभूतीही मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला या संघटनेत पुन्हा घेतले गेले आहे. त्याचा निषेध म्हणून या अभिनेत्रींनी बंड पुकारले आहे.