मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या साकारणार खलनायिका
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने ‘फन्ने खान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनर्पदार्पण केलं. या चित्रपटानंतर ऐश्वर्या आता खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये सक्रीय झाली आहे. आता ती लवकरच दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटामध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘मिड डे’च्या वृत्तानुसार, मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटामध्ये ऐश्वर्या झळकणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक कादंबरी ‘पोन्नियिन’वर आधारित आहे. या चित्रपटामध्ये चोळ साम्राज्यावर भाष्य करण्यात येणार आहे. यामध्ये ऐश्वर्या नंदिनी ही व्यक्तीरेखा साकारणार असून नंदिनी ही पेरिया पझुवेत्तारय्यर यांची पत्नी होती. तिने चोल साम्राज्याच्या चान्सलर आणि खजिनदार पदाची जबाबदारी पार पाडली होती. या वर्षांच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, ऐश्वर्याने यापूर्वी २००५ मध्ये ‘खाकी’ आणि २००६मधील ‘धूम २’ या चित्रपटांमध्ये खलनायिकेची व्यक्तीरेखा साकारली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऐश्वर्या खलनायिकेची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे मणिरत्नम आणि ऐश्वर्या यांची चांगली मैत्री असून या मैत्रीमुळेच ऐश्वर्याने या चित्रपटासाठी होकार कळविला आहे. मणिरत्नम Mani Ratnam यांच्या १९९७ साली आलेल्या ‘इरुवर’ या राजकीय चित्रपटातून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.