‘मणिकर्णिका’चं यश नंतर साजरं करू, कंगनानं रद्द केली पार्टी
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे लष्करी ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. बॉलिवूडनंही या हल्ल्याचा निषेध करत या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतनंही ‘मणिकर्णिका’ची सक्सेस पार्टी रद्द केली आहे.
‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला. ‘मणिकर्णिका’मध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत असणाऱ्या कंगनानं चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. गेल्या वर्षभरात चित्रपटाच्या निर्मितीपासून ते प्रदर्शनामध्येही अनेक अडचणींचा समाना कंगनाला करावा लागला. मात्र संकटांवर मात करत ‘मणिकर्णिका’ अखेर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची भरभरून प्रशंसा चित्रपटाला मिळाली.
म्हणूनच कंगानं ‘मणिकर्णिका’चं यश साजर करण्याचं ठरवलं होतं. यासाठी तिनं चित्रपटाच्या संपूर्णटीम आणि बॉलिवूडसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. १६ फेब्रुवारीला ही पार्टी होणार होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर कंगनानं ही पार्टी रद्द केली आहे. यश नंतर साजरं करू असं कंगनानं म्हटलं आहे. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना कंगनानं श्रद्धांजली देखील वाहिली आहे.
तर दुसरीकडे ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. कराची आर्ट काँन्सिलकडून त्यांना कराची साहित्य महोत्सवाचं आमंत्रण होतं. मात्र पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.