मंत्रालयासमोर महिलेचा अात्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
मुंबई – मंत्रालयाच्या परिसरात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गेटसमोर एका 45 वर्षीय महिलेने स्वत:च्या अंगावर राँकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला आहे. जवळच असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत महिलेकडे धाव घेत तिला आत्महत्या करण्यापासून रोखले.
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव राधाबाई साळुंके असे आहे. त्या मराठवाड्यातील बीड जिल्हयातील आहेत. जमीनीचा निकाल संबंधित महिलेच्या विरोधात लागल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रथम चौकशीत समोर आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे यांनी दिली. तसेच सदर महिलेला ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे.
आजच्या या घटनेमुळे मंत्रालय परिसर हादरून गेला आहे. याआधीही आत्महत्येच्या घटना मंत्रालयाच्या परिसरात घडल्या आहेत. त्यामध्ये जानेवारी महिन्यात धर्मा पाटील (वय 80 वर्षे ) या शेतकऱ्याने विष घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हर्षल रावते या तरूणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मात्र आजच्या घटनेदरम्यान पोलीसाच्या सतर्कतेमुळे महिलेस आत्महत्या करण्यास रोखल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत.